लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचे ठरवले तर
- …त्यांना कोणीच रोखू शकत नाही
- राजद नेते तेजस्वी यादव यांचे प्रतिपादन
पाटणा – बिहार मध्ये अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला चांगले यश मिळाल्याने तेजस्वी यादव हे बिहार मध्ये नवीन राजकीय चेहरा म्हणून उदयाला येत आहेत.
एका मुलाखतीत त्यांनी देशातील विरोधकांच्या आघाडी विषयीही सविस्तर भाष्य केले आहे. कॉंग्रेस सर्वाधिक जाग मिळवून सत्तेवर आली तर आपण पंतप्रधान बनण्यास तयार आहोत असे विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे पुष्टीकरण करताना तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की या देशातील लोकांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे ठरवले तर त्यांन कोणीच रोखू शकत नाही.
राहुल गांधी यांच्या विधानाच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की राहुल गांधी यांनी केलेले ते विधान व्यवहार्य आहे. दुसरा कोणताही राजकीय पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयाला येणार असेल तर त्यांचाहीं नेता असे विधान करू शकतो त्यात गैर असे काहीच नाही. या देशातील लोकशाहीत प्रत्येक पक्षाच्या नेत्याला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आज विरोधकांच्या ऐक्याची गरज असून आम्ही या ऐक्यासाठी प्रयत्नशील राहु असेही तेजस्वी यादव यांनी यावेळी नमूद केले.
राहुल गांधी यांचे नेतृत्व असतानाही कॉंग्रेसला अनेक राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, त्या विषयी विचारले असता तेजस्वी यादव म्हणाले की राहुल गांधी यांच्या कडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यात आता खूप फरक पडला आहे. ते लहान राजकीय पक्षांशी ज्या पद्धतीने संवाद साधत आहेत त्यात त्यांची चुणुक दिसून येत आहे. लोकांच्या आणि पत्रकारांच्या अवघड प्रश्नांनाही ते धाडसाने सामोर जात आहेत. पण मोदीं मध्ये असे धाडस आढळून येत नाही म्हणूनच त्यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.
गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी भाजपची चांगलीच पळापळ केली होती. आज राहुल गांधी जेथे जेथे जातात त्या भागात मोदी आणि शहांना अधिक जोरकसपणे त्यांचा प्रचार करावा लागतो. मोदी राहुल गांधी यांना इतके का घाबरतात असा सवालही त्यांनी केला आहे.
विरोधी आघाडीतील नेतृत्वाच्या विषयावर एनवेळी सर्वसंमतीने तोडगा काढला जाईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. विरोधी आघाडीत आज नेतृत्वाचा कोणताच वाद नाही असे स्पष्ट करताना तेजस्वी यादव म्हणाले की या आघाडीतील कोणत्या नेत्याने आज मीच नेता होणार असे विधान केले आहे? त्यामुळे आमच्यापुढे ही काही वेगळी समस्या नाही.