लोकांनी दिलेला कौल डावलण्याचा प्रयत्न
- येडियुरप्पांचा कॉंग्रेसवर आरोप
बंगळुरू – जेडीएसशी आघाडी करून कॉंग्रेस मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत असून त्यांचा हा प्रयत्न म्हणजे लोकांनी दिलेला कौल डावलण्याचा प्रकार आहे असा आरोप भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. ते म्हणाले की या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेस सरकारला नाकारले आहे.
लोकांनी बदलासाठी कौल दिला आहे. त्या बदलाचा सन्मान न करता मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा सरकारचा डाव आहे असे ते म्हणाले. कर्नाटकच्या जनतेचा कौल हा कॉंग्रेस मुक्त भारतासाठी दिलेला कौल आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. लोकांनी सिद्धरामैय्या सरकारला पुर्ण नाकारले असून स्वत: मुख्यमंत्रीही चामुंडेश्वर मधून पराभूत झाले आहेत. तरीही त्यांचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू असून हा प्रकार निषेधार्ह आहे असे ते म्हणाले. कर्नाटकातील जनता हा प्रकार सहन करणार नाही असेही त्यांनी नमूद केले.