breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लोकसभेच्या प्रचारतोफा थंडावल्या; सोमवारी मतदान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण ९ राज्यांमध्ये मतदान होईल.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यात तब्बल ३.११ कोटी मतदार मतदानास पात्र असणार आहेत. या मतदानाबरोबरच ३२३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

राज्यातील ‘या’ १७ मतदारसंघांत मतदान

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या १७ मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

यांचे काय होणार?

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), मिलींद देवरा (दक्षिण मुंबई), अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या टप्प्यातील ठळक चेहरे असणार आहेत.

शिवसेना-भाजपचे वर्चस्व

चौथ्या टप्प्यात ज्या जागांवर निवडणूक होत आहे त्या सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. २०१४च्या निवडणुकीत या १७ जागांपैकी ८ जागा भाजपने तर ९ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या.

लक्ष्यवेधी लढती

उत्तर मुंबईत गेल्यावेळी विक्रमी मताधिक्क्याने निवडून येणारे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे यावेळी काँग्रेस उमेदवार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे आव्हान आहे. प्रचाराचा रंग पाहता येथे तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबईची लढतही लक्ष्यवेधी ठरली आहे. येथे काँग्रेसचे मिलींद देवरा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आमनेसामने उभे ठाकले आहेत. मतांचं गणित लक्षात घेता ही लढतही चुरशीची ठरेल, असे दिसते. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे. उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होत आहे तर नाशिकमध्येही समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना) यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात लोकसभेची रणधुमाळी थंडावणार

उत्तर प्रदेशनंतर (८० जागा) लोकसभेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी पाठवणारं महाराष्ट्र (४८ जागा) हे दुसरं राज्य असून सोमवारी होणाऱ्या मतदानानंतर राज्यातील लोकसभेची रणधुमाळी थंडावणार आहे. राज्यात याआधी ११, १८ आणि २३ एप्रिल असे मतदानाचे तीन टप्पे पार पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button