लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची पहिल्या यादीत या नावावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवार छाननी समितीच्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले,असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सांगली मतदारसंघात प्रतीक पाटील, मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात संजय निरुपम, हिंगोलीतून राजीव सातव यांची नावे आघाडीवर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभा
निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली असली तरी अहमदनगरसह इतर काही जागांवरून निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पुण्याच्या जागेवर दावा केला आहे. तर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या अहमदनगरच्या जागेवर दावा केलेला आहे. दोन्ही पक्ष या जागा सोडण्यास तयार नाहीत. तिढ्यात असलेल्या जागा वगळता इतर जागावरील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला दोन्ही पक्षांनी वेग दिल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचकडून जी नावे निश्चित करण्यात आल्याचे समजते, त्यात सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, रामटेकमधून मुकुल वासनिक, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे आणि नांदेडमधून अमिता चव्हाण यांचा समावेश आहे. नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस गंभीरपणे विचार करीत आहे. ज्या उमेदवारांच्या नावावर निर्णय घेण्यात आला आहे, त्या नावांची घोषणा येत्या सोमवारी होणार्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीनंतर केली जाणार आहे.