लॉकडाऊन ऐवजी पर्यायी व्यवस्था करा
– कोल्हापुरातील विविध पक्ष, संघटनाची मागणी
कोल्हापुर । प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हयातही काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होते आहे, ही संभाव्य धोक्याची घंटा असली तरी, गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊन मुळे सामान्य कामगार वर्ग, मजूर, दुकानदार, व्यापारी वर्ग, उद्योजक आणि सामान्य जनता यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत पुन्हा आपल्याकडून लॉकडाऊन चे अम्मल बजावणी बाबत घोषणा झाल्यास लोक covid 19 पासून कदाचित वाचतील मात्र भूकबळी ने किती लोकांचे जीव जातील. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी कोल्हापुरातील विविध पक्ष, संघटनाच्या वतीने करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले.
निमंत्रक अनिल म्हमाने, कुलदीप गायकवाड, कॉ. रघुनाथ कांबळे, प्रियाताई शिरगावकर, डॉ. दयानंद ठाणेकर, संदीप कांबळे, विजय हेगडे, किरण कांबळे, सिद्धार्थ कांबळे यासह विविध पक्ष, संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवेदनात नमुद करण्यात आले की, जगभर 23 मार्च 2020 रोजी कोविड – 19 या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव पसरल्याने लॉकडाऊन हा त्या काळात सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात औषधोपचार उपलब्ध नसल्याने आणि अनिवार्य परिस्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना काही ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, ही चिंतेची बाब आहे. मात्र सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार लॉकडाऊन बाबतचे स्थानिक निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना आहे.
त्यामुळे आपण पुन्हा लॉकडाऊनचा विचार अथवा अम्मल बजावणी न करता, त्या ऐवजी इतर पर्यायी मार्गांचा विचार करावा, ही आम्ही मागणी करत आहोत. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना, शिस्त राखण्याचे आवाहन यांचे पालन कोल्हापूर चे सुजाण नागरिक नक्की करतील अन् राज्यात नवा पायंडा पाडतील, ह्याची आम्हाला खात्री वाटते. या संवेदनशील अधिकारी वर्गाकडून योग्य तो निर्णय होईल, अशी अशी मागणी या वेळी करण्यात आली.