लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण घटले; मुंबई होतेय अधिक सुरक्षित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे. जानेवारी-ऑगस्ट या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटले असून, मुंबई अधिक सुरक्षित होत असल्याचे चित्र आहे.
हत्या, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आदी घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटना ४१ टक्के आणि चोरीच्या घटना ४७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानं बंद होती. चोरट्यांनी बंद दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसते. चोरट्यांनी बहुतांश बंद असलेली दुकानं आणि स्टॉल्स फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी पाहता, हुंड्यासाठी छळाच्या घटना ५१ टक्क्यांनी, तर हुंडाबळी संबंधित घटनांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६६८ घटना घडल्या होत्या. या वर्षी त्यात घट झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. दुसरीकडे याच कालावधीत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.