लालू प्रसाद यादव यांना उपचारासाठी रांचीहून दिल्लीला हलवलं
नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना न्यूमोनियाचे निदान झाल्याने पुढील उपचारांसाठी शनिवारी रुग्णवाहिकेने रांचीहून दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हलविले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.
राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स)चे डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, ‘लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे वय लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एम्समधील विशेतज्ज्ञांसोबत आमचे बोलणे झाले आहे.’
दरम्यान, लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि आरजेडी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी गोपाळगंजमधील फुलवारीयामध्ये पूजा-पाठ केलं. फुलवारीयाच्या पंच मंदिरामध्ये, वैदिक जप करून पुरोहित दयाशंकर पांडे आणि हिरामण दास यांनी लालू यांची प्रकृती सुधारण्यासाठी खास पूजा अर्चना केली. यासह समर्थकांनी हवनही केले.