लातूरच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट;सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
लातूर | मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने चाड्यावर मूठ धरली. मात्र पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून दुबार पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न आहे. खरीपासाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असताना केवळ पन्नास टक्केच बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या बियाणांवर भर द्यावा लागला होता.
घरगुती बियाणे वापरताना त्यावर योग्य प्रक्रिया करावी, त्याची उगवण झाल्यावरच पेरणी करावी अशाप्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाने मात्र, उगवण क्षमता नसलेली बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारलेले आहे. जिल्ह्यात शेकडोहून अधिक शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर 110 हेक्टरावरील बियाणांची उगवण झाली नसल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात हे क्षेत्र जरी वाढीव असले तरी याकडे कृषी विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात आहे. एका एकरातील पेरणी करण्यााठी शेतकऱ्यांना सरासरी 10 हजार रुपये मोजावे लागतात. याकरिता हात ऊसणे किंवा शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे. त्यात पुन्हा दुबार पेरणीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचा ओघ कायम असल्याने याबाबत जिल्हास्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या बियाणांची उगवण क्षमता पाहिली जात आहे. शिवाय पंचनामेही केले जात आहेत. मात्र, सर्वच शेतकऱ्यांबद्दल असे होताना दिसत नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अंतिम टप्प्यात खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यंदा तर सुरुवातीलाच कृषी विभागाच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.