लग्नासाठी विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली | औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी शिवारातील जंगलात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, दोघेही नातेवाईकच असल्याने घरच्यांचा लग्नास विरोध असल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथे सचिन दत्तराव कऱ्हाळे हा शेती काम व जनावरे चारण्याचे काम करत होता तर त्याच गावात राहणाऱ्या दीपा कऱ्हाळे ही देखील शेळ्या चारण्यासाठी जात होती. दोघेही एकाच शिवारात जनावरे चारण्यासाठी येत असल्याने दररोज भेटणे व बोलणे होत होते. त्यातच त्यांचे प्रेम संबंध जुळले. मात्र लग्न करण्यासाठी त्यांच्या दोघांच्याही घरून विरोध होता.
दोघेही जवळच्या नात्यातील असल्याने विवाह कसा करायचा असा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला. आणि गावापासून अंदाजे दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या जंगलात दोघांनी त्या ठिकाणी असलेल्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पासून दोघेही बेपत्ता असल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला. आज सकाळी एका तरुणाला जंगलात त्या दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले.
त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. व्ही.भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार सय्यद अली, गजानन गडदे, निरंजन नलवार, पवन चाटसे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत कुठलीही नोंद झाली नसून पुढील तपास पोलिस करीत आहेत.