रेल्वेरुळ ओलांडताना १८ दिवसांत १७७ मृत्यू
मुंबई: लोकल मार्गावर धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडण्यातून अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या १८ दिवसांत सर्व मार्गांवरील अशा अपघाती मृत्यूंची संख्या १७७वर पोहोचली आहे. त्यात, गुरुवारच्या अपघाती मृत्यूची संख्या १२ इतकी असून जखमींची संख्या १३ आहे.
पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल प्रवासात रविवारी एकाच दिवसात विविध अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकारचे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करूनही यश येत नसल्याने प्रशासन हतबल ठरले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ६ मे रोजी एकाच दिवसात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात प्रामुख्याने रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यूमुखी पडतात. त्यासह धावती लोकल पकडणे, लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहणे आदींचा समावेश होतो. यापूर्वीही २४ जानेवारी रोजी तसेच १६ आणि २ फेब्रुवारी रोजी १४ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता.
गुरुवारी रात्री ९.३०च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले येथे स्टेशन उपअधीक्षक अशोक आझाद यांचा लोकलच्या धडकेने मृत्यू झाला. फास्ट डाऊन मार्गावर एक अपघात झाल्याची माहिती आझाद यांना मिळाली होती. त्याचा आढावा घेण्यासाठी ते विलेपार्ले अपघातस्थळी गेले होते. त्यानंतर परत येत असताना लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू ओढवला.