रुपीनगर येथील मुख्य रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य
– खड्डे बुजविण्याची शिवसनेची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुपीनगर येथील मुख्य रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य तयार झाला आहे. गेली एक वर्षापासून कामामध्ये सुधारणा न दिसून आल्याने अनेकांना शारीरिक त्रास भोगावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भोसरी विधानसभा शिवसेना समन्वयक दादासाहेब नरळे यांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केले आहे की, तळवडे परिसरातील सर्वात विकसित रुपीनगर येथील मुख्य व्यापार पेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. गेली एक वर्षापासून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामध्येच स्मार्ट सिटी माध्यमातून पुन्हा खोदायचे काम चालू झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक करण्यात व ये-जा करण्यास त्रास होत आहे. मुख्य व्यापारपेठ व प्रमुख रस्ता हनुमान मंदिराजवळ व बस स्टॉप परिसर सर्व रस्ता खराब झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे. अनेकदा अपघात होऊन रहिवाशी जखमी झालेले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा त्रास सोसावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने तरी दखल घ्यावी, अशी मागणी नरळे यांनी केली.
सतत रस्त्यावरच वर्दळ असलेल्या रुपीनगरच्या मुख्य व्यापार पेठेमध्ये रस्त्यावर खडी, अनाधिकृत हात गाडी भाजीवाले यांचा भाजी मंडई नसल्यामुळे त्रास आहे. त्यामध्ये रस्ता खराब झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. प्रशासन फक्त कर वसुलीसाठी तत्पर असल्याचे दिसून येते. परंतु नागरिकांच्या सेवेला दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.