राष्ट्रवादीमूळे वारक-यांना भेटवस्तू देण्याचा घेतला निर्णय – अमित बच्छाव
पिंपरी – वारक-यांना भेटवस्तू देण्यास सत्ताधारी भाजपने नकार दिला होता. परंतू, राष्ट्रवादी काॅंग्रेसने भेटवस्तू देण्याची परंपरा खंडीत करण्याच्या धोरणावर जोरदार विरोध दर्शेविला. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून स्वखर्चातून वारक-यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्ताधा-यांकडून तातडीने महापालिकेत बैठक बोलावून वारक-यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. परंतु गेल्या वर्षी महापालिकेत भाजपची सत्ता येताच,पालखीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीची जादा दराने निविदा मंजूर करून सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार केला.
शहरातील विकासकामांसाठी नेमण्यात आलेले सल्लागार तसेच विवीध निरर्थक बाबींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या भाजपला वर्षानुवर्षांपासून चालत आलेली वारक-यांना भेटवस्तू देण्याची स्तुत्य परंपरा मोडीत काढून मनमानी कारभार करायचा होता. परंतु, पिंपरी चिंचवड ही भूमी संत, महात्मे, युगपुरूषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. याचीच जाण ठेवत राष्ट्रवादीने “शेंडी तुटो अथवा पारंबी” या उक्तीप्रमाणे आजतागायत वारक-यांचा यथोचित सन्मान केला आहे. या वर्षी सत्ताधा-यांची नकारात्मक भूमिका पाहता राष्ट्रवादीने स्वखर्चातून वारक-यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची धास्ती घेऊन सत्ताधा-यांनी वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या मनातील हेतू जनतेने ओळखला अाहे. म्हणून सत्ताधा-यांनी वारक-यांबद्दल स्नेह असल्याचा खोटा आव आणू नये असे बच्छाव यांनी म्हटले आहे.