रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट : लालदिव्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रदेशाध्यक्षपद नाकारले होते!
औरंगाबाद । प्रतिनिधी
पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचं काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही. त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या जाण्यानेही महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले. निसर्गाला पोकळी मान्य नसते. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. नेता हा अशा कार्यकर्त्यांमुळेच मोठा होतो. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वाची उणीव जाणवणार नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.