राम मंदिर भूमीपूजनाच्या निमित्तानं राज्यातील मंदिरे खुली करणार ?
देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर राज्यभरातील मंदीर बंद करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला . देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंदिरे देखील खुली करण्यात यावी अशी सगळेच मागणी करत होते.मात्र त्याबद्दल ठोस असा निर्णय घेण्यात आला नव्हता.
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा व उत्तर भारतीय संघानेही मंदिरे खुली करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भाजप शिष्टमंडळाने ही मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे समजतं आहे.
राममंदीर भूमीपूजनासाठी किमान राज्यातील मंदिरे एक दिवसासाठी तरी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असून भूमीपूजना दिवशी शंखनाद, थाळीनाद करण्याचा विचार बोलून दाखवला जात आहे. याबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार, मंदिरे फक्त एक दिवसच सुरू राहणार की या दिवसापासून ती खुली केली जाणार याबाबत अद्याप राज्यसरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.