रामाच्या नावावर मते मागणा-या भाजप-शिवसेनेला सत्तेतून हद्दपार करा – पार्थ पवार
पवनमावळ ( महा ई न्यूज ) – गुढीपाडव्याच्या दिवशी मला अत्यंत वाईट वाटले, पाडव्यादिवशी नववर्षे सुरु होते, शिवसेनेने पहिले मंदिर-फिर सरकार म्हटले, या घोषणेचा त्यांना युती करताना विसर पडला. भाजप सरकारनेही राममंदिर बांधण्याच्या नावावर राजकारण केले. मागील लोकसभा निवडणूकीत मोदींनी राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला. परंतू, पाच वर्षे लोटली तरीही त्यांनी आयोध्येत राममंदिर उभारलेले नाही, केवळ हिंदूची मते मागण्यासाठी राममंदिराचा मुद्दा पुन्हा-पुन्हा प्रचारात वापरला जात आहे, यामुळे रामाच्या नावावर मते मागणा-या भाजप-शिवसेनेला लाज कशी वाटत नाही, त्यांना सत्तेतून हाकलून बाहेर काढा, असे आवाहन पार्थ पवार यांनी मतदारांना केले.
ब्राम्हणनोली येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्षश्री.गणेशआप्पा ढोरे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपकभाऊ हुलावळे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक सुनिलभाऊ ढोरे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक अशोक शेडगे संचालक महादुमामा कालेकर जेष्ठ नेते नामदेव ठुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन कदम, तालुका ओबोसी सेलचे माजी अध्यक्ष माऊली आढाव, जेष्ठ नेते अशोकराव घारे, माजी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, पवन मावळ महिला अध्यक्षा जयश्री पवार, सरचिटणीस उत्तम घोटकुले माजी सरपंच माउली निम्बळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे पार्थ पवार म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांचा भूमिपुजनाचा कार्यक्रम निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतला जातो. हे युती सरकार निव्वळ जातीचे राजकारण करीत आहे. देश अडचणीत आला आहे. या सरकारने देशावरील कर्जाचा बोजा वाढवून ठेवला आहे. ते कर्ज फेडण्याचे मोठे संकट युपीए सरकारपुढे राहणार आहे. केवळ स्वताःच्या जाहिराती करुन प्रसिध्दी मिळविण्यासाठी मोदींंनी जनतेचे हजारो कोटी रुपये खर्ची घातले आहेत. खोट्या जाहिराती दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. अशा जाहिरातीवर विश्वास न ठेवता. जो विकास काम करतो. त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहनही पवार यांनी मतदारांना केले.
मावळात पार्थ पवारांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
सभेला संबोधित करताना पार्थ पवारांनी नागरिकांना भेडसावणा-या समस्या जाणून घेतल्या. त्यावर नागरिक म्हणाले की, आमच्या उशाला धरण पण, आमच्या घशाला अजूनही कोरड आहे, गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गावातील रस्तेही नीट नाहीत. धरणग्रस्त शेतक-यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. गावातील नागरिकांना पर्यटनाचा व्यवसायही करता येत नाही. अशा अनेक समस्यां नागरिकांनी पार्थ पवारांपुढे मांडल्या. त्यावर पार्थ पवार म्हणाले की, रस्ता आणि पाणी पुरवठ्यांची समस्या, मी खासदार झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात सोडवून देईन, तसेच इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी मित्र पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन त्याही सोडविण्याचा प्रयत्न करेन. मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जेवढं शक्य आहे, तेवढंच मी बोलतो. खोटी आश्वासने देणं ही आमच्या रक्तात नाही. असेही पार्थ पवारांना नागरिकांना म्हटले.