रात्री उशिरा शहरात फिरत असल्याने पोलीस अधिकाऱ्याने झटकलं, तरुणांकडून हत्या
अमरावती जिल्ह्यातील अचलापूर येथे सहाय्यक उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी लोखंडी रॉडने वार करत सहाय्यक उपनिरीक्षक शांतीलाल पटेल (५५) यांची हत्या केली. शांतीलाल पटेल यांनी तरुणांना रात्री उशिरापर्यंत शहरात फिरत असल्याने हटकलं होतं. याचाच राग धरत तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला.
शांतीलाल पटेल रात्री गस्त घातल्यानंतर दुचाकीवरुन आपल्या घरी चालले होते. यावेळी आरोपी तरुणांनी दुचाकीवरुन त्यांच्या पाठलाग करत लोखंडी रॉडने त्यांच्यावर वार केला. रात्री ३.३० वाजता हा हल्ला झाला. शांतीलाल पटेल यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
‘आरोपी तरुणांनी आपल्याला फक्त दुचाकीला धडक द्यायची होती, मात्र चुकून रॉड लागला असा दावा केला आहे’, अशी माहिती अमरावतीचे पोलीस अधिक्षक दिलीप झाळके यांनी दिली आहे. ‘तिघेही आरोपी दारुच्या नशेत होते. रात्री २ वाजता बस स्टॅण्डवर फिरत असल्याने शांतीलाल पटेल यांच्या गस्त पथकाने त्यांना हटकलं होतं. आरोपींनी त्यावेळी तेथून काढता पाय घेतला, मात्र नंतर पुन्हा परत येऊन पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. यानंतर पोलीस तेथून निघून गेले होते’, असंही त्यांनी सांगितलं आहे.
आरोपींची नावे केदार, नयन मांडले आणि मिलन खोलापुरे अशी आहेत. तिघांना अटक करण्यात आली आहे.