राणीची बाग आजपासून अनलॉक
मुंबई – मुंबईकरांचं आकर्षण असलेली राणीची बाग आजपासून पुन्हा खुली झाली आहे. लॉकडाऊननंतर बागेचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. औरंगाबादच्या सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांची एक जोडी राणीच्या बागेत आणली गेली आहे. याशिवाय अस्वल, तरस, कोल्हे आणि बिबट्याचंसुद्धा याठिकाणी दर्शन होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षाखालील मुलं यांनी शक्यतो राणीच्या बागेला भेट देणं टाळावं, अशी सूचना पालिकेने केली आहे. दरम्यान, औरंगाबादच्या सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयातून एका वर्षापूर्वी शक्ती वाघ आणि करिश्मा वाघीण अशी पट्टेरी वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्यात आली. आता त्यांचं क्वारंटाईन आणि प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. त्यांना जंगलाचाच आभास व्हावा यासाठी राणीच्या बागेत त्यांचं खास घरसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे. आपण पिंजऱ्यात आहोत असं त्यांना वाटू नये, अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता वाघांना बघण्यासाठी ताडोबाला किंवा बाहेर कुठे जाण्याची गरज नाहीये. मुंबईतच या पट्टेरी वाघांच्या जोडीला बघता येणार आहे.