‘राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाही’- सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . देशातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे ज्या निकालाकडे लागले आहेत, तो पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार. ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.त्यामुळे पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या विद्यार्थी-पालकांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली होती. या दरम्यान सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज जाहीर केला. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांमधील अंतिम सत्र परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकांवर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे. विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्यात असे निर्देश देणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना या याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.