राज्यात वाढला थंडीचा कडाका
पुण्याचे तापमान १०.४ अंशावर
पुणे| प्रतिनिधी
उत्तर भारतात सुरू झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे. रविवारी (दि. ७ ) पुणे शहरात राज्यात सर्वांत कमी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोल्हापुरातील किमान तापमान 16.9 इतके नोंदले गेले आहे. मुंबईचा पारा 18 अंशांवर आला. त्यामुळे राज्यही गारठत असल्याचे चित्र रविवारी अनुभवायला मिळाले.
गेल्या आठवड्यातील चढ्या तापमानानंतर आता मुंबई शहर आणि उपनगरातील किमान तापमानात घट होऊ लागली आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईत किमान तापमानात घट होताना या मोसमात प्रथमच ते 18 अंशांवर गेले. रविवारी त्यामध्ये पुन्हा घट होऊन हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर 18.4 अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. शहरातील किमान तापमानातदेखील घट झाली असली तरी 20 अंशापेक्षा अधिकच राहिले. कुलाबा केंद्रावर 21.4 अंश तापमान नोंदविण्यात आले. अनेक ठिकाणी तापमान 20 अंशाच्या आसपास राहिले.
रविवारी राज्यातील अनेक शहरांत दिवसभर गार वारे सुटल्याने प्रथमच रात्री अनेक भागांत शेकोट्या पेटल्याचे चित्र होते. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्याने हिमालयापासून मध्य प्रदेशपर्यंत थंडीची जोरदार लाट आली आहे. गंगोत्री, जमनोत्री, केदारनाथ या भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्याने जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्ये गारठली असून, तेथील किमान तापमान 7 अंशांवर आले आहे. या भागात बर्फवृष्टी अन् पाऊस सुरू आहे; तर दक्षिण भारतातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढला आहे.