breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार!

राज्यातील विविध भागांतील दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाचा इशारा

राज्यातील दुष्काळाची तीव्रता येत्या काळात अधिक वाढणार असून चारा व पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्राच्या पाहणी पथकाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. त्यावेळी दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पाठविलेल्या सात हजार ९६२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा स्वीकार करून राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पथकाकडे केली.

दुष्काळ स्थिती गंभीर असल्यामुळे मदत देण्यासाठी पाहणी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची ग्वाही पथकाच्या प्रमुख सहसचिव श्रीमती झा यांनी या वेळी दिली. राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या तीन पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांतील दौरे केले. त्यानंतर शुक्रवारी सह्य़ाद्री अतिथिगृहात या पथकांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

महसूल, कृषी आणि मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, दुग्धविकास, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी या वेळी उपस्थित होते. केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव छवी झा, ए. के. तिवारी, विजय ठाकरे, मानश चौधरी, एस. सी. शर्मा आदींचा समावेश होता.  राज्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या निकषानुसार १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करून उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करून राज्य शासनाच्या मदतीतून तेथे उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अद्यापही काही ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून त्याची तपासणी करून येत्या दोन ते तीन दिवसांत त्याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी बैठकीनंतर दिली. राज्यातील दुष्काळाची स्थिती बिकट असून जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पथकाकडे केली असून त्यांनीही अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी सहमती दर्शविली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या पथकानेही या वेळी दौऱ्यातील निरिक्षणे मांडताना राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ असून जनतेकडून चारा छावण्या व टँकरची मागणी होत असल्याचे सांगितले. राज्यातील अनेक भागात येत्या काळात आणखी मोठय़ा प्रमाणात चारा व पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण पथकातील सदस्यांनी या वेळी नोंदविले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button