राज्यात कोरोनाचे रविवारी आढळले १५ नवे रुग्ण
पुणे – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
नव्या १५ कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १४ जण मुंबईतील तर १ जण पुण्यातील असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यापूर्वी ज्या रुग्णांना याची लागण झालेली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. लोकांनी गर्दी करु नये. राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका. बहुतांश रुग्ण हे सामान्य आहेत. त्यातील फक्त काहीजणच आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे ते म्हणाले.