breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर आणि अमरावतीत गारपीट

मुंबई | नववर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे.

हिंगोली शहरात आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, शिवाय कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात या गावांत पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचे नुकसान देखील झाले आहे. तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आंबिया आणि मृग बहरातील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, कपाशी, गहू, चना पिकाचे नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे. परतवाडा, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि तिवसा या तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button