राज्यातील १२,७११ ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी
मुंबई – ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच गाव पातळीवर निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे. अनेक जिल्ह्यांतील निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळतेय. राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी होणार असून एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
राज्यात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे अंतिमतः 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली असून आता आज या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?
ठाणे – 143, पालघर – 3, रायगड – 78, रत्नागिरी – 360, सिंधुदुर्ग – 66, नाशिक – 565, धुळे – 182, जळगाव – 687, नंदुरबार – 64, अहमनगर – 705, पुणे – 649, सोलापूर – 593, सातारा – 652, सांगली – 142, कोल्हापूर – 386, औरंगाबाद – 579, बीड – 111, नांदेड – 1013, परभणी – 498, उस्मानाबाद – 382, जालना – 446, लातूर – 383, हिंगोली – 421, अमरावती – 537, अकोला – 214, यवतमाळ – 925, वाशीम – 152, बुलडाणा – 498, नागपूर – 127, वर्धा – 50, चंद्रपूर – 604, भंडारा – 145, गोंदिया – 181 आणि गडचिरोली – 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं.