राज्यातील रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राज्यातील रेस्टॉरंटस व्यावसायिकांबद्दल एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. “रेस्टॉरंटस व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. “कोरोना काळात राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे”, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
“कोरोनामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. आताच्या स्थितीत पार्सल्सची मुभा देण्यात आली असली, तरी या उद्योगाला सावरण्यासाठी ते पुरेसे नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.रेस्टॉरंट व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक सर्व आवश्यक दिशानिर्देश जारी करावेत. कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा”, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केले आहे
सुप्रिया सुळेंनी या ट्विटसोबतच ‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब’चे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी त्यांना लिहिलेले पत्रही जोडले आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत सुप्रिया सुळेंनी राज्यातील रेस्टॉरंट चालक-मालकांच्या समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आता सुप्रिया सुळेंच्या या जाहीर मागणीनंतर राज्य सरकार याबाबत नेमका कोणता निर्णय घेते ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.