राज्यातील बदल्यांची सीआयडी चौकशी करा-चंद्रकांत पाटील
पुणे | कोरोना काळात राज्यात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नाहीतर न्यायालयात दाद मागू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच, पाटलांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी बदलीच्या कायद्याचा भंग झाल्याचा आरोप केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोनाच्या महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले. कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले. बदलीच्या कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले. बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणे भाग पडेल.”
“राज्य सरकारच्या वित्त विभागाने 4 मे रोजी शासन निर्णय जारी केला आणि त्यामध्ये कोरोनामुळे बदल्या करु नयेत, असं म्हटलं. पण त्या अनुषंगाने 7 जुलै रोजी शासन निर्णय जारी करताना सामान्य प्रशासन विभागाने 15 टक्के बदल्यांना परवानगी दिली. राज्य सरकारचे धोरण मनमानीपणे बदलले. तसेच कोरोनाविषयी उपाययोजनांमध्ये सातत्य राखले नाही. पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देताना 31 मेपर्यंत करायच्या सर्वसाधारण बदल्या असं स्पष्ट म्हटलं होतं. तरीही बदल्या करण्यास दिलेली 31 जुलैची मुदत आणि नंतर वाढविलेली 10 ऑगस्टची मुदत याचा आधार घेऊन 31 मेपर्यंत बदल्या झाल्या. यात ज्या अधिकारी–कर्मचारी यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ संपत नव्हता त्यांनाही हटवण्यात आलं. मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आलं. यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.