राज्यातील दहावीचा निकाल ८९.४१ टक्के
मुंबई – मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार, ८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होत असून उद्यापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. राज्याचा निकाल ८९. ४१ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून कोकणातील ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.
राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ४ लाख १४ हजार ९१४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९९ हजार २६२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
- दहावी, बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैला होणार. अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा एकत्रच फेरपरीक्षा.
- राज्यातील ९ विभागीय मंडळांमधून एकूण १ लाख १३ हजार ०७८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी होते. यातील ४९ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४३. ५४ टक्के आहे.
- यंदा एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली. यातील ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला.
- गुणपत्रिका मिळण्याची तारीख दोन दिवसात जाहीर करणार, शकुंतला काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
- या वर्षी राज्यातील २१ हजार ९५७ शाळांपैकी ४, ०२८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६. ८७ टक्के लागला आहे.
- दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी. परीक्षेत एकूण ९१.९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल ८७.२७ टक्के इतका आहे.
निकालाची विभागीय टक्केवारी
१) कोकण : ९६.०० टक्के
२) कोल्हापूर : ९३.८८ टक्के
३) पुणे : ९२.०८ टक्के
४) मुंबई : ९०.४१ टक्के
५) औरंगाबाद : ८८.८१ टक्के
६) नाशिक : ८७.४२ टक्के
७) अमरावती : ८६.४९ टक्के
८) लातूर : ८६.३० टक्के
९) नागपूर : ८५.९७ टक्के
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमधून एकूण १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्याचा निकाल ८९. ४१ टक्के, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, कोकणातील ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा. नागपूरमधील ८५. ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.