राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जपली ‘अशी’ही मैत्री; ‘दोस्ती’चा असाही आदर्श!
अचलपूर | महाईन्यूज | प्रतिनिधी
प्रत्येक सुख- दुःख वाटणारा- समजून घेणारा दोस्त असावा…मैत्री निभावणारा आणि संकटात धावून येणारा…प्रत्येकाच्या जीवनात एक दोस्त असतोच…! नव्हे असायलाच हवा.
आपल्या स्वतंत्र स्टाईल आणि सर्वसमावेशक राहाणीमानामुळे प्रसिद्ध असलेले प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या स्वर्गीय मित्राचे स्वप्न पूर्ण करून दोस्तीचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
स्व. सुधीर डकरे हे बच्चू कडू यांच्या सुरवातीच्या राजकीय जीवनापासून सोबत असलेला मित्र व कट्टर कार्यकर्ता आहेत. रविवारी सुधीर यांची मुलगी वैष्णवी हिचे लग्न झाले. यावेळी बच्चू कडू यांनी आपली सौभाग्यवती नयनासोबत बैष्णवी हिचे कन्यादान केले. तसेच वैष्णवी व अमोलराव यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वादही दिले.
बच्चू कडू यांनी आपल्या मित्राच्या पश्चात त्याच्या मुलीचे कन्यादान करून एकप्रकारे मैत्री जपली आणि त्यांच्या कुटुंबियांना आधारही दिला. आजच्या राजकारणात एखादा नेता मोठा झाला की, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते, अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. पण, राज्यमंत्री बच्चू कडू त्याला अपवाद ठरले आहेत.