राज्यभरात शेतकऱ्यांचे १४ मे रोजी जेलभरो आंदोलन
मुंबई : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप करत राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे १४ मेरोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, वीज बिल मुक्ती, शेतमालाला दीडपट हमीभाव अशा विविध मागण्याही या आंदोलनात केल्या जाणार आहेत.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफ केलेले नसून याऊलट सरकारने दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून वसूली सुरु केली आहे. कर्ज थकीत असल्याने बँकेतून नव्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. दुधाबाबतही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवरही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.
राज्यातील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २ लाखांहून अधिक शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असा दावा सुकाणू समितीचे सदस्य विश्वास उटगी यांनी केला आहे.