राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या; खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी
कोल्हापूर – लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी लोकसभेत केली. लक्षवेधीमध्ये महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
खासदार महाडिक म्हणाले, आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले. आपल्या करवीर संस्थानातून त्यांनी देशातील पहिले आरक्षण लागू केले होते. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचाही भारतरत्नने सन्मान करावा, अशी मागणी धनंजय महाडिकांनी संसदेत लक्षवेधी सूचनेदरम्यान केली. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सामाजिक चळवळीत अग्रणी असलेले थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहू महाराजांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यापूर्वीच १९९०मध्ये मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.