राजधानी एक्स्प्रेसमधील चोरट्यांवर राहणार सीसीटीव्हीची नजर
मुंबई : मुंबई ते दिल्ली या मार्गावर धावणाऱ्या प्रतिष्ठेच्या राजधानी एक्स्प्रेसमधील वाढत्या चोऱ्यांची रेल्वेकडून विभागाकडून गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता यापुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पर्याय निवडला आहे. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने राजधानी एक्स्प्रेसमधील पाच डब्यांमध्ये प्रत्येकी चार सीसीटीव्ही पुरवण्यात आले आहेत. इतर डब्यांमध्येही लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड दिली जाणार आहे.
भारतीय रेल्वे सेवेत राजधानी एक्स्प्रेस ही मानाची गाडी समजली जाते. परंतु या गाडीत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने बरीच टीकाही होत आहे. या गाडीत झालेल्या चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्यांना शोधण्यात रेल्वे सुरक्षा बलास (आरपीएफ) यश आलेले नाही. त्यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाने सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे पुरवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण आपसूकच कमी होईल, असा दावा केला जात आहे.