रशियासोबतच्या प्रकल्पातून भारत बाजूला होणार ?
नवी दिल्ली : रशियासोबत मिळून 2 लाख कोटी रुपयांच्या खर्चाने लढाऊ विमान तयार करण्याच्या प्रकल्पातून बाहेर पडण्याची इच्छा भारताने व्यक्त केली आहे. भारताने रशियासोबत 5 व्या पिढीचे लढाऊ विमान तयार करण्याच्या प्रकल्पाचा खर्च सातत्याने वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अधिक खर्चामुळे या प्रकल्पाची पुढील वाटचाल थांबविण्याची सूचना भारताने रशियाला केली आहे. दोन्ही देशांदरम्यान या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरील चर्चा अद्याप स्थगित झालेली नाही. दोन्ही देशांदरम्यान खर्चाचे योग्य वाटप करण्याचे एखादे सूत्र समोर आल्यास लढाऊ विमानाच्या सह-विकासावर पुन्हा विचार करण्याची भारताची तयारी आहे.
दोन्ही देशांदरम्यान या प्रकल्पाचा खर्च वाटून घेण्याबद्दल कोणतेही सूत्र निश्चित झाल्यास हा प्रकल्प सुरू ठेवला जाऊ शकतो. दोन्ही देशांमधील सैन्यसंबंध नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने भारत आणि रशियादरम्यान 2007 मध्ये संयुक्तपणे लढाऊ विमान निर्मितीबद्दल महत्त्वाचा करार झाला होता. हा प्रकल्प मागील 11 वर्षांपासून दोन्ही देशांदरम्यान अनेक मुद्यांवरील असहमतीमुळे प्रलंबित आहे. आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान या प्रकल्पाचा खर्च, विमान निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान आणि निर्माण होणाऱया विमानांच्या संख्येबद्दल कोणतीच सहमती होऊ शकली नाही. या प्रकल्पावर 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा खर्च येईल असा अनुमान व्यक्त झाला आहे.