‘रयत’ शिक्षण संस्थेच्या महावृक्षाखाली तरुण पिढ्या तयार झाल्या : शरद पवार
साताऱ्यात १०० वा वर्धापन दिन दिमाखात साजरा
नारायण मूर्ती, अनु आगा यांचा विशेष सन्मान
- null
- सातारा । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बहुजन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्यासाठी कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. या महावृक्षाच्या छायेत गेल्या १०० वर्षांत तरुण पिढ्या तयार झाल्या आहेत, असे मत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचा गौरवशाली १०० वा वर्धापनदिन शुक्रवारी संपन्न होत आहे. रयतमधल्या सर्व सहकाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सेवावृत्तीचे उद्योजक श्री. नारायण मूर्ती तसेच माजी खासदार श्रीमती अनु आगा या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले की, या शतकी टप्प्यावर आमच्या या संस्थेची वाटचाल अखंड, अथक व अविचल निर्धारपूर्वक सुरू राहील याची ग्वाही आम्ही सगळे मिळून देत आहोत. कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रोपट्याचा आज महावटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या छायेखाली एक तरुण पिढी तयार होत आहे. शिक्षण व ज्ञानदानाचा काम अखंड सुरू आहे. बदलत्या परिस्थितीनुसार काही बदल करणे गरजेचे होते तसे बदल रयतने केलेही.
***
माजी खासदार अनु आगा यांच्या कार्याचा गौरव…
महाराष्ट्रात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाच्या कारखान्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बॉइलर. या बॉइलरचे उत्पादन थरमॅक्स या कंपनीने केले. आपल्याला माहीत आहे की ऊसाच्या मळीपासून इथनॉल निर्माण होते. ऊसाच्या चिपाडापासून वीजही तयार केली जाते. ऊसाच्या चिपाडापासून वीज तयार करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती थरमॅक्सने उभी केली आहे. या थरमॅक्सचे नेतृत्व अनु आगा करतात. त्या संसदेत माझ्या सहकारी होत्या. संसदेत त्या वेळेवर यायच्या, सभागृहाचे नियम पाळायच्या, देश पुढे कसा जाईल यासाठी विषय मांडायच्या. त्यांचे हे काम मी जवळून पाहिले आहे. अनु आगा यांच्या कामगिरीमुळे मुलींना प्रेरणा मिळाली. कर्तृत्वाची मक्तेदारी फक्त पुरुषांची नसते असा संदेश अनु आगा यांनी दिला आहे, अशा शब्दांत श्री. पवार यांनी श्रीमती आगा यांचे कौतुक केले.
****
उद्योजक नारायण मूर्ती यांचाही सन्मान…
नारायण मूर्ती यांनी अमेरिकेसारख्या देशात इन्फोटेकच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना रोजगार दिला. तंत्रज्ञानाची उंची त्यांनी वाढवली. भारतीय काय चमत्कार करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून लाखो हातांना काम दिले. त्यांनी कमावलेल्या संपत्तीचा वापर स्वतः साठी केला नाही. त्यांनी आपली संपत्ती समाजाला अर्पित केली. नव्या पिढीला उभे करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना शिक्षण दिले. प्रेरणादायी या दोन्ही निवडीमुळे रयतच्या पुरस्काराचा सन्मान झाला असे मला वाटते, असेही शरद पवार यांनी व्यासपीठावर बोलताना सांगीतले.