रमाकांत मोरे यांच्या निधनाने कामगार क्षेत्रातील भक्कम नेतृत्व गमावले – माजी आमदार विलास लांडे
पिंपरी । प्रतिनिधी
रमाकांत मोरे यांचे भारतीय कामगार सेनेचे जाळे पसरवण्यात मोठे योगदान आहे. अनेक कंपन्यांमध्ये मतभेद दूर करून त्यांनी वेतन करार घडवून आणले. कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी मोरे यांनी समर्थपणे वाटाघाटी केल्या. शिवसेनेला आकार देणारे लढाऊ कामगार नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील. रमाकांत मोरे यांच्या निधनाने शिवसेनेने कामगार क्षेत्रातील खंदा नेता गमाविला असल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिवंगत मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष रमाकांत मोरे यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. कामगार सेनेचे ते माजी अध्यक्ष होते. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. कामगार क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
विलास लांडे म्हणाले की, रमाकांत मोरे हे शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना या संघटनेचे अनेक वर्षे समर्थपणे नेतृत्व करत होते . त्यांच्या निधनामुळे कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व गमावले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कामगारांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मोरे यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवली होती. त्यांनी हा विश्वास अखेरपर्यंत जपला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेना कायम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आली. मोरे यांनी सलग बारा वर्षे या संघटनेचे नेतृत्व केले.
शिवसेनेचे दुसरे झुंजार नेते कमांडर दत्ताजी साळवी हे भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. दत्ताजी साळवी यांच्या पश्चात काही काळ रमाकांत मोरे यांनी नेतृत्व केले. मोरे यांच्या कार्यकाळात संघटना वाढली आणि सामर्थ्यशालीही झाली. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची योग्य दखल बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी अनेक यशस्वी लढे दिले. त्या प्रत्येक लढ्यातून मोरे यांचे नेतृत्व स्थापित होत गेले असल्याची भावना माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, कामगार क्षेत्रातील उद्योजक बाळासाहेब उऱ्हे यांनी शोक व्यक्त केला.