रत्नागिरी, नागपुरातील पाचवी ते आठवीच्या शाळांचा आज श्रीगणेशा
मुंबई – राज्यातील महत्त्वाच्या शहरांत आता शाळेची घंटा वाजणार आहे. नागपूर आणि रत्नागिरीतील शाळा आजपासून सुरु होणार आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून या शाळा बंद होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांचा आजपासून श्रीगणेशा होणार आहे. गेल्या 10 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आजपासून रत्नागिरीतील शाळा सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 3 हजार 202 शाळा आज उघडणार आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या मुलांची संख्या 80 हजारांवर आहे. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 695 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
वाचा :-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातही कोव्हिड काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तब्बल 10 महिन्यानंतर 1 हजार 668 शाळांमध्ये वर्ग सुरु होणार आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे 1 लाख 48 हजार विद्यार्थी आहेत. पालकांचे संमतीपत्र घेऊनच शाळा सुरु होणार आहेत. तसेच शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणेही बंधनकारक करण्यात आले आहे.