येरवडा कारागृहातून 5 जण फरार, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे : पुण्यातील येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीनबंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहे. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण, ( रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), सनी टायरन पिंटो(रा.काळेवाडी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे) या 5 गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. देवगन, गणेश, अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यांवर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.