येणारा काळ कठीण, गदीं कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल
पुणे – कोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
अजित पवार यांनी सांगितलं की, प्रत्येक राज्यात मेडिकल टीम पाठवल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे. विवाह, अंत्यविधीप्रसंगी होणारी गर्दी टाळली पाहिजे. सरकारी कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह कशी चालवता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत मालकांमी माणुसकीने वागून त्यांनी किमान वेतन द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.