मोबाईलच्या मॅपने केला घात; कळसूबाईकडे निघालेले तीन पिंपरी-चिंचवडकर गेले वाहून
अकोले – मोबाईलवरील मॅप किंवा जीपीएसने चुकीची माहिती दिल्याने तीन पिंपरी चिंचवडकरांची फसवणूक झाली आहे. तिघांवर पिंपरी चिंचवडकरांवर चुकीच्या माहितीमुळे काळ ओढावला.
सतीश सुरेश घुले (वय ३४), गुरुसत्य राजेश्र्वर राक्षेकर (वय ४२), समीर अतुलकर (वय ४४ सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हे एम .एच.१४ के. वाय. ४०७९ या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री निघाले होते.
मोबाईलवर दिसणाऱ्या मॅपप्रमाणे ते प्रवास करू लागले. त्यांना कळसूबाई शिखरावर जायचे होते. मात्र, मॅपने त्यांना कोतूळवरून राजूर मार्ग दाखवायला हवा होता. तो जवळचा आणि सुरक्षित होता. परंतु ते कोतूळहून अकोलेकडे निघाले.
या मार्गादरम्यान मुळा नदीवरील जुना पूल लागला. पिंपळगाव खांड धरण भरल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे. चालकाला वाटले पुलावर थोडेच पाणी असेल. परंतु पुढे गेल्यावर त्यांचे वाहन पुलावरून धरणाच्या पाण्यात पडले. ती वेळ रात्री पावणेदोनची होती. त्यामुळे काहीच कळत नव्हते. तिघेही वाहू लागले. त्यातील दोघांना पोहायला येत असल्याने ते बाहेर पडले. त्यांनी पाण्याच्या बाहेर येत आरडाओरड सुरू केली.
त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारील वस्तीवरील लोक तेथे धावले. ते सतीश यांचा शोध घेऊ लागले. सकाळी आठ वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. सकाळी गावात निरोप जाताच चंद्रकांत घाटकर व काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घुले यांचा मृत्यू झाला होता. गाडीसह घुले यांचा मृतदेह बाहेर काढला. मोबाईलने चुकीचा मार्ग दाखवल्याने मृत्यूच्या मार्गाने जावे लागले.
दरम्यान, पिपरी चिंचवडमध्ये दुःखाचे वातावरण असून नातेवाईक कोतूळ येथे पोहचले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलावर कोणतेही अडथळे अगर बोर्ड न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.