मोदी सरकारने वंचित, बहूजन पीडितांवर अन्याय केला – असदुद्दीन आेवैसी
आैरंगाबाद – इथल्या वंचित लोकांना संविधानाने बळ दिले आहे. मोदी सरकारमुळे वंचित, बहुजन पीडितांवर अन्याय केला आहे. मात्र, आता वंचित, दलित बहुजनांच्या एकीचं बळ दिसेल. राज्यघटना रा. स्व. संघ, मोदींनी दिलेली नाही, गांधी परिवार आणि पवारांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी संविधान बचावच्या घोषणा देऊ नयेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सक्षम आहोत. त्यासाठी आपल्याला प्रकाश आंबेडकरांना साथ द्यायला हवी, असे आवाहन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांनी उपस्थितंना केले.
औरंगाबाद येथे बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मंगळवारी पार पडली, यावेळी ते बोलत होते. या आघाडीत भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
आेवैसी म्हणाले , बाबासाहेबांनी देशाला घटना दिल्यानंतर सर्वांना सांगितले की, तुम्हाला चार गोष्टी स्वतः लढून मिळवायला हव्यात. त्या म्हणजे स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय. मात्र, सध्या या गोष्टी कुठे आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे मोदींच्या विचारांपासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असा होतो, देशापासून स्वातंत्र्य नव्हे. नाहीतर लोक आम्हाला देशद्रोही समजतील, असा टोलाही यावेळी ओवेसी यांनी लगावला.
आज महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील सर्वांत मोठा नेता कोण असेल तर ते महात्मा गांधी नसून डॉ. आंबेडकर आहेत असे खळबळजनक विधान यावेळी ओवेसी यांनी केले. दरम्यान, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीवर ओवेसी यांनी सडकून टीका केली. मोदी सरकारच्या काळात सुरु असलेली पेट्रोल-डीझेल दरवाढ, मुस्लिम-दलितांवर होत असलेल्या मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.