मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली- मनमोहन सिंग
मोदी सरकारने संसद, सीबीआय यांच्यासारख्या संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आणून लोकशाही कमकुवत करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले,असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. संसद व सीबीआय यासह अनेक संस्थांची विश्वासार्हता बरबाद झाली असून मोदी सरकारने लोकशाही कमकुवत करण्यासाठी हेतुपुरस्सर त्यासाठी प्रयत्न केले आहेत. कायद्याचे राज्य धोक्यात आले असून आताची परिस्थिती बदलली नाही तर इतिहास आताच्या पिढीला कधीही माफ करणार नाही. नोटाबंदी हा संघटित लुटीचा प्रकार तर होताच, शिवाय यात कायदेशीर मार्गाने लुटीचे तंत्र अवलंबण्यात आले. आता नोटाबंदीची कृती होऊन गेली आहे त्यावर मागे फिरता येणार नाही, पण ज्या सरकारने या धोकादायक मार्गावर देशाला नेले त्यासरकारला मतदारांनी दूर करणे हा एकमेव उपाय आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर केला असून विरोधकांबाबत सतत शिवराळ प्रचार करणे त्यांना शोभत नाही, ते नेहमी असंसदीय भाषा करतात, असेही ते म्हणाले.
रिझव्र्ह बँक व सीबीआयचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने या संस्थांची विश्वासार्हता घालवली, स्वायत्तता हिरावून घेतली हे लोकशाहीस धोक्याचे आहे. रिझव्र्ह बँक व अर्थ मंत्रालय यांच्यात सध्या तणाव आहे पण त्यांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर व अर्थमंत्री यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असतात. त्यांनी एकत्र कोम करणे गरजेचे असते. जरी देश सरकार चालवत असले तरी रिझव्र्ह बँकेच्या कायद्यानुसार गव्हर्नरांवरही काही जबाबदारी टाकलेली आहे. यात नुकतेच समेटाचे प्रयत्न करण्यात आले ही चांगली गोष्ट आहे.