मोदी सरकारकडून लोकांना मुर्ख बनवण्याचे काम – नवाब मलिक
– मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदयाबाबत न कळल्यासारखे मोदी सरकार वागत आहे.
पिंपरी | प्रतिनिधी
मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत बोलताना शरद पवार यांचा उल्लेख केला. त्यावर नवाब मलिक यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला.
सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या नावांनी स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित आहे. हे भाजप जनतेत विषय मांडत आहे. मोदींना आजपर्यंत कळलंच नाही पवारसाहेब या देशातील कृषी सुधार पक्षकार होते तेव्हापण आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्रसरकारने मॉडेल कायदा केला नाही.राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केला.
आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही पण एकमत निर्माण करणे. लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान करत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. सर्वांना मान्य असेल तरच कायदा केला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.