मोदी, योगींनी निराधार महिलांसाठी योजना आणावी- ओवेसी
लातूर : मुस्लिम महिलांच्या तीन तलाकवर बोलणाऱ्या पंतप्रधान मोदी व योगींनी देशातील चार कोटी निराधार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणावी अशी मागणी एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी लातूर येथील महापालिकेच्या प्रचार सभेत बोलताना केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ओवेसी यांनी कॉंग्रेसच्या गैरकारभारावर देखील टीका केली.
लातूर महापालिकेच्या प्रचाराचा शेवटच्या दिवशी लातुरात मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या सभा होत्या. “मै सतरा तारीख को फीर आऊंगा’ म्हणत उत्सुकता ताणलेल्या ओवेसी यांच्या सभेसाठी भर उन्हात मोठी गर्दी जमली होती. भाषणाच्या सुरुवातीलाच ओवेसी यांनी तीन तलाकच्या प्रश्नाला हात घातला. “पीएम मोदी साहब और यूपी के मुख्यमंत्री योगी तीन तलाक के मुद्दे पर बहुत कुछ बोल रहे है’अशी सुरुवात करत त्यांनी मोदी आणि योगी यांनी या विषयावर बोलण्यापेक्षा देशातील 4 कोटी निराधार महिलांच्या कल्याणासाठी एखादी चांगली योजना आणावी असा सल्ला दिला. लातूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलतांना, कॉंग्रेसने फक्त कंत्राटदार पोसण्याचे काम केल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला.