मोदी आणि शहांचा अश्वमेध आम्ही रोखला – कुमारस्वामी
बंगळूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा अश्वमेध रोखण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे मी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर म्हटले होते. आता आम्हाला (जेडीएस आणि कॉंग्रेस) त्यांचा अश्वमेध रोखण्यात यश आले आहे, असे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आज म्हटले.
कुमारस्वामी येथे पत्रकारांशी बोलत होते. जेडीएसने राष्ट्रीय हितासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा सल्ला विविध पक्षांच्या नेत्यांनी दिला. त्यानुसार मी पाऊल उचलले, असे म्हणत त्यांनी स्थिर सरकार देण्याची ग्वाही दिली. आमच्या आघाडीचे सरकार दीर्घ काळ टिकेल का, अशी शंका अनेकांना आहे. मी माझ्या स्वत:च्या आणि राज्य सरकारच्या वर्तणुकीने मत बदलण्यास भाग पाडेल.
आघाडीचे सरकार एका पक्षाच्या सरकारपेक्षाही अधिक स्थिर असेल अशी ग्वाही मी जनतेला देऊ इच्छितो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर जेडीएस विरोधी बाकांवर बसेल, असे कुमारस्वामी यांनी निवडणुकीदरम्यान म्हटले होते. त्याची आठवण पत्रकारांनी करून दिल्यावर कुमारस्वामी उत्तरले, मी परिस्थितीचे अपत्य आहे. वैयक्तिक इच्छा दूूर ठेवणे मला भाग पडले.