मोदींनी सांगावं, मुस्लिम भारतातून जातील: आझम खान
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आजम खान यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. जर मोदींना भारतातून मुस्लिम जावे असे वाटत असेल तर त्यांनी त्याचा मार्गही सांगावा, असे आझम खान यांनी म्हटले आहे.
राम मंदिर उभारण्यास सरकारने मंजुरी द्यावी यासाठी दबाव बनवण्यासाठी अयोध्येत बोलावण्यात आलेल्या धर्मसभेवर त्यांनी भाष्य केले. जर मोदींची भारतातून मुस्लिम जावे अशी इच्छा असेल तर त्यांनी मुस्लिम समाजाला त्याचा मार्गही सांगावा. ते भारतातून जातील, परंतु त्यांना हेही करायचे नाही. ‘सबका साथ, सबका विकास’चा जप करायचा आहे आणि समूहाने हल्ला (मॉब लिंचिंग) करत निरपराध लोकांचा जीव घ्यायचा, ही त्यांची नियत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सत्ताधारी राज्यात आणि देशात भीतीचे वातावरण तयार करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. रविवारी धर्मसभेपूर्वी अयोध्येत प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित सभेत हिंदू संत राम मंदिराच्या निर्मितीसाठीची योजना निश्चित करण्यासाठी एकत्र आले होते.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि सहा महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणल्याचा आरोप केला. धर्मनिरपेक्ष देशातील सरकारचे काम हे मंदिर, मठ, मशीद, गुरुद्वारा किंवा चर्चची उभारणी करणे नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.