मोदींकडून समाजात दुही – मनमोहन सिंग
मनमोहन सिंग यांचा आरोप
बेंगळूरु – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर समाजात दुही निर्माण करत आहेत, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. पंतप्रधानांनीच खालच्या पातळीवरील भाषेमध्ये टीका करण्याचा प्रकार आपल्यासाठी धक्कादायक असल्याचेही मनमोहन सिंग म्हणाले. मोदी सरकारच्या विनाशकारी धोरणांवर आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावरही मनमोहन सिंग यांनी जोरदार टीका केली.
विरोधकांवर वैयक्तिक टीका केल्याबद्दल मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचा अशाप्रकारे उपयोग केलेला नव्हता. तशा प्रकारे मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा दररोज वापर केला जातो आहे. हे देशासाठी चांगले नाही, असे त्यांनी नमूद केले.
कर्नाटकमध्ये समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. हे कर्नाटकसाठी आणि देशासाठीही चांगले नाही. देशाच्या पंतप्रधाने निवडणूक होत असलेल्या राज्यात जाऊन पंतप्रधानपदाला न शोभणाऱ्या भाषेत टीका करणे अयोग्य आहे. ज्यापद्धतीने मोदी बोलत आहेत, तसे कोणतेही पंतप्रधान बोलले नव्हते. या सगळ्यातून मोदी धडा घेतील आणि समाजात दुही निर्माण करणार नाहीत, अशी आशा मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
कर्नाटक हे देशातील सर्वात समृद्ध राज्य असल्याने तेथील निवडणूकांच्या निकालाचा देशाच्या धोरणावर परिणाम होईल. देशातील गैरव्यवहार, मोदी सरकारचे आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे सर्व सामान्य जनतेचा बॅंकिंग व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. “युपीए’ सरकारच्या काळात गुंतवणूकीचे प्रमाण 34-35 टक्क्यांपर्यंत वाढले होते. मात्र मोदी सरकारच्या काळात ते वाढणे थांबले आहे. याचा रोजगाराला मोठा फटका बसेल. मात्र असेही मनमोहन सिंग म्हणाले.