मुलाविषयी विचालेल्या प्रश्नावर विराट म्हणाला…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच मुले आणि भविष्यातील कुटुंबासंदर्भात भाष्य केलं आहे. माझा संपूर्ण वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न असेल. माझ्या करिअरचे, त्यात मिळवलेल्या यशाचे दडपण मुलांवर पडू नये, याची दक्षता मी घेईन, असे विराटने एका मुलाखतीत म्हटले. यावेळी विराट पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का आणि कुटुंबाविषयी भरभरुन बोलला. मुलांचे संगोपन करताना, ती त्यांचे भविष्य घडवत असताना, त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून मी मिळवलेल्या ट्रॉफीज घरात ठेवणार नसल्याचेही तो म्हणाला.
अनुष्का आणि विराट डिसेंबर 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाआधी आणि लग्नानंतरही अनेकदा विराट त्याच्या आयुष्यातील अनुष्काचे असलेले महत्त्व याविषयी दिलखुलासपणे बोलला आहे. मात्र ईएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत विराटने पहिल्यांदाच मुलांविषयी आणि भविष्यातील कुटुंबाविषयी भाष्य केले. मला माझा संपूर्ण वेळ मुलांसाठी द्यायचा आहे. मी मिळवलेले यश माझ्या मुलांच्या भविष्यावर दडपण आणणारे ठरु नये, असे मला वाटते, अशा शब्दांमध्ये विराटने बाबा झाल्यावर काय करणार, याबद्दल मोकळेपणानं संवाद साधला. मी मिळवलेल्या ट्रॉफीज घरात ठेवणार नाही. त्यामुळे मुलांवर नाहक दडपण येईल, असेही विराट पुढे म्हणाला.
‘मला आयुष्य आहे. मला माझे कुटुंब आहे. भविष्यात आम्हाला मुले होतील. माझा संपूर्ण वेळ त्यांचा असेल. याबद्दल माझ्या मनात कोणताही किंतु-परंतु नाही. माझ्या करिअरशी संबंधित कोणतीही वस्तू घरात नसेल, याची काळजी मी बाबा झाल्यावर घेईन. त्यामुळे करिअरमध्ये मी मिळवलेले यश दाखवणाऱ्या वस्तू, ट्रॉफीज मुले मोठी होत असताना घरात ठेवणार नाही,’ असे विराट म्हणाला. यावेळी विराटने अनुष्काबद्दलदेखील भाष्य केले. ‘अनुष्काच्या सहवासात राहत असल्यापासून मला अनेक गोष्टींची जाणीव झाली. अनेक परिस्थितीत ती माझ्या मदतीला धावून आली,’ असेही विराटने म्हटले.