मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, खटला चालवण्याचे आदेश
दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी खटला चालविण्यात यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.
२०१४ च्या निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपविल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर आहे. ही दोन्ही गुन्हेगारी प्रकरण नागपूरमधील असून १९९६ आणि १९९८ मधील आहेत. याप्रकरणी वकील सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
त्यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी कायदाअंतर्गत मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.