मुंबई हल्ल्याबाबत कुणाच्या पोचपावतीची भारताला गरज नाही
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची स्पष्टोक्ती; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना उत्तर
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती होती आणि त्याबाबत कुणाच्या पोचपावतीची (अॅक्नॉलेजमेंट) भारताला गरज नाही, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे.
२००८ सालचा मुंबई दहशतवादी हल्ला हे ‘दहशतवादी कृत्य’ होते आणि या प्रकरणाची तड लावणे हे पाकिस्तानच्या हिताचे आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. एका कार्यक्रमानंतर त्यावर प्रतिक्रिया विचारली असता रावत यांनी वरील स्पष्टोक्ती केली. खान यांनी एका मुलाखतीत केलेले हे वक्तव्य म्हणजे या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची अप्रत्यक्ष पोचपावती असल्याचा अर्थ काढण्यात येत आहे.
ते कुणी केले हे आंतरराष्ट्रीय समुदायाला माहीत नाही. पण तसे नसते, तरीही ते कुणी केले हे आम्हाला माहीत होते. अर्थात, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने दिलेली कबुली ही चांगली गोष्ट आहे, असे जनरल रावत म्हणाले. हा हल्ला कुणी केला हे आम्हाला माहीत आहे. याबाबत कुणी आणखी काही वक्तव्य करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
२०१६ साली नियंत्रण रेषेपलीकडील लक्ष्यभेदी हल्ल्यांचा अवाजवी प्रचार करण्यात आल्याबद्दल लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे माजी प्रमुख ले.ज. डी.एस. हुडा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, हे वक्तव्य हुडा यांचे वैयक्तिक मत होते, असे लष्करप्रमुख म्हणाले. स्वत: या मोहिमेत सहभागी असलेल्या हुडा यांच्या म्हणण्याचा आदर करतो, असेही त्यांनी सांगितले.