मुंबई पोलिसांचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने : अनिल देशमुख
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
“मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम 174 अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला.”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत संघराज्याची जी संकल्पना आहे त्याबाबत घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं, असं मी सांगू इच्छितो. सीबीआयला तपास द्यावा की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेतो. राज्य सरकारने एनओसी दिली की तो तपास सीबीआयकडे जातो. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यापद्धतीने राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करेल.”
“या प्रकरणाचा विरोधी पक्षाचे नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे,” असे अनिल देशमुख म्हणाले.