मुंबई-पुणेसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी; येत्या 24-48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील 24 तासांत जोरदार पाऊस झालाय . मुंबई नंतर पुण्यात देखील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला पहायला मिळत आहे. यात मुंबईत70-100 मिमी, ठाणे-नवी मुंबईत 100-120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अपडेट्सनुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईसह , ठाणे , पालघर , रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील 2-3 दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम राहणार असून ऑगस्ट अखरेपर्यंत राज्यात समाधानकारक पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच या काळात कोकणात पाऊस चांगला सक्रिय राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच पुण्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये समाधानकारक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने तुळशी, विहार ही तलावं ओव्हरफ्लो झाली. तसंच तलावातील पाणीसाठा 60.17% इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.