मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला ‘स्वराज्याच्या आरमार प्रमुखाचं’ नाव द्या- छत्रपती संभाजी राजे
मुंबई | महाईन्यूज
छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली असून, ट्विटमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टॅग केलं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहासप्रेमींच्या मनातली ही मागणी असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल हा विश्वास आहे. कोकणच्या या सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं असल्याचंही मतही छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे अलौकिक कार्य आपणास माहीतच आहे. महाराजांनी अनेक क्षेत्रात महनीय कार्य केले. आपणांस हा इतिहास ठाऊकच आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एक सुसज्ज आरमाराची स्थापन केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक म्हटले जाते. महाराजांनी त्या काळात आरमाराचे महत्त्व ओळखून स्थापन केली जेव्हा समकालीन मुघलांनी किंवा इतर राजांनी विचारही केला नसेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर, स्वराज्याचे रक्षण शिवपुत्र संभाजी महाराज, शिवपुत्र राजाराम महाराज आणि छत्रपती ताराबाई राणीसाहेब महाराजांनी प्राणपणाने केले. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. यवनांच्या तावडीतून स्वराज्याचे रक्षण करण्याकरिता अगणित मावळ्यांनी आपले योगदान दिले, आपली प्राणाहूती दिली. स्वराज्याच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही.
दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमधील नौदल प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे. अशा स्वराज्यनिष्ठ महान विराची दखल परिवहन मंत्री म्हणून घ्याल आणि मुंबई- गोवा महार्गाला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव द्याल असा ठाम विश्वास मला आणि तमाम शिवभक्त, तसेत इतिहास प्रेमींना वाटतो, अशी आशाही छत्रपती संभाजी राजेंनी व्यक्त केली आहे.